महाराष्ट्राच्या ह्याच वारश्याचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे २ जुलै १९९१ रोजी “महाराष्ट्र कला अकादमी” ची स्थापना करण्यात आली. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत अकादमी कार्यरत असून कलांचे जतन-संवर्धन करणे, विविध कलाक्षेत्रांतील कलाकारांना कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तेजन देणे, विविध कलाक्षेत्रांतील उदयोन्मुख कलाकारांसाठी शिबिरे, कार्यशाळा आयोजित करणे, संशोधन प्रकल्प राबविणे, विविध महोत्सव, कार्यक्रम आयोजित करणे, आंतरराज्यीय सांस्कृतिक देवाण-घेवाण व्हावी याकरिता कार्य करणे ही महाराष्ट्र कला अकादमीच्या स्थापनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
महाराष्ट्र भूषण सन्मानाने गौरविलेले पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राच्या साहित्य आणि कला क्षेत्रातील लाडके व्यक्तिमत्व. साहित्य, रंगभूमी, दूरदर्शन, चित्रपट, संगीत, इ. क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी सन्मान म्हणून ४ जुलै २००१ पासून “महाराष्ट्र कला अकादमी”ला पुलंचे नाव देऊन “पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी” असे नामकरण करण्यात आले.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत रवींद्र नाट्यमंदिर (आसनक्षमता ९११), मिनी थियटर (लघु नाट्यगृह) (आसनक्षमता १९९), प्रायोगिक नाट्यगृह (आसनक्षमता २००), खुले नाट्यगृह (एम्फी थियटर), स्टुडिओ (क्रोमा शुटिंग, रेकॉर्डिंग व डबिंग), चित्रकला स्टुडिओ, मातीकला स्टुडिओ, कॉन्फरन्स हॉल, डेमॉनस्ट्रेशन हॉल, छायाचित्र प्रदर्शनासाठी कला दालन, इतर प्रदर्शनांसाठी भव्य प्रदर्शन दालन तसेच तालमी, चर्चासत्रे, व्याख्याने, बैठकी, इ. कार्यक्रमांसाठी प्रशस्त वातानुकूलित दालने, इ. सुविधा आहेत.
या सुविधा अकादमीचे सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा, शिबिरे व आभ्यासक्रमांसाठी वापरल्या जातात तसेच आयोजक व्यक्ती / कलाकार व संस्थांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि तालमी, चर्चासत्रे, व्याख्याने, बैठकी, इ. साठी भाडेतत्वावर देण्यात येतात. राज्यातील महत्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ओळखली जाते.